वसई विरार प्रतिनिधी
विरार – सामाजिक समता, बंधुता आणि धम्माच्या मूल्यांचा जागर करणारा चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा आदर्श आजही तितकाच प्रेरणादायी ठरत असल्याचे चित्र विरार नगरीत पाहायला मिळाले. भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्साहात आणि आदरभावाने साजरी करण्यात आली.
मनवेलपाडा, कारगील येथील वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्या तथा समता सैनिक दलाच्या सैनिक सौ. वैशालीताई नरेश मोरे आणि सौ. सिमरनताई साळवी यांनी अभिवादन केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राचे महासचिव मा. मिलिंद कांबळे यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनातील परिवर्तन, धम्म स्वीकार आणि समाजहिताच्या धोरणांवर प्रकाश टाकला. त्यांनी सम्राट अशोक यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश पुढे नेण्याचे आवाहन केले.
तसेच भारतीय बौद्ध महासभेचे विरार शहर अध्यक्ष मा. सुनील बेडे गुरुजी यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा देत, अशोकांच्या धम्मनीतीचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली.
या कार्यक्रमाला विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये पालघर जिल्हा उपाध्यक्ष मा. नरेश मोरे, वसई तालुका माजी अध्यक्ष मा. प्रफुल्ल हळदे, स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष मा. गणेश चव्हाण, महासचिव मा. बाळाराम मोहिते, मा. जितेंद्र तांबे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृती समितीचे अध्यक्ष मा. सुरेश मणचेकर, सेक्रेटरी मा. राजेंद्र, मा. सुभाष दवणे, युवा आघाडीचे मा. फिरोज शेख, मा. नासिर शेख, मा. दिनेश मोहिते, मा. सुजल शेलार तसेच जेष्ठ सदस्य मा. विश्वनाथ जाधव आणि मा. गणपत कांबळे (पेहलवान) आदींचा समावेश होता.
समारोपात, सम्राट अशोक यांच्या विचारांचा वारसा जपत समाजात शांतता, समता आणि बंधुभाव निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
