माहीम येथील आंबेडकर आळी परिसरात नवकोटीची माता, त्याग, समर्पण आणि संघर्षाचे प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांची जयंती गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी केली. सामाजिक एकोपा, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर यावेळी ठळकपणे दिसून आला.
कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात रमाई मातेचे मोलाचे योगदान अधोरेखित केले. बाबासाहेबांच्या विचारांची पायाभरणी, समाजउद्धारासाठी दिलेला खंबीर पाठिंबा आणि कुटुंबासाठी केलेला त्याग हा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
या जयंतीनिमित्त सामाजिक प्रबोधनपर भाषणे, भीमगीतांचे सादरीकरण तसेच एकतेचा संदेश देणारे उपक्रम राबवण्यात आले. परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. विशेषतः महिलांच्या सहभागामुळे माता रमाई यांच्या संघर्षशील जीवनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचला.
कार्यक्रमाच्या शेवटी समाजात समता, न्याय आणि बंधुतेची मूल्ये जपण्याचा संकल्प करण्यात आला. माता रमाई यांची जयंती ही केवळ स्मरणदिन न राहता, सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा ठरावी, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
