पालघर | प्रतिनिधी
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (पीएम पोषण) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये तांदूळ व धान्याचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषद पालघरच्या शिक्षण विभागाने संबंधित पुरवठादार संस्थेला दिले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रणडे (भा.प्र.से.) यांच्या स्वाक्षरीने ३१ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, राज्य शासनाकडून नवीन पुरवठा आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत
. मात्र, शाळांमध्ये तांदूळ व धान्याचा तुटवडा निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या पोषण आहार योजनेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पुढील आदेश मिळेपर्यंत शाळास्तरावर तांदूळ व धान्याचा पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, भविष्यात शासनाकडून पुरवठ्याबाबत वेगळे आदेश प्राप्त न झाल्यास या कालावधीत करण्यात आलेल्या तांदूळ व धान्य पुरवठ्याची देयके संबंधित करारातील अटी व शर्तींनुसार जिल्हा परिषद पालघरमार्फत अदा करण्यात येणार आहेत.
तसेच, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालकांकडून पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करून या कालावधीत झालेल्या पुरवठ्याचे समायोजन करण्यात येईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आदेशाची प्रत प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.
